भोर तालुक्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ ! तीन महिन्यांत १२३ जण बाधित !! जनजागृती, तातडीचे उपचार आणि आरोग्य यंत्रणेच्या सजगतेमुळे जीवितहानी टळली
भोर : भोर तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून गेल्या तीन महिन्यांत तब्बल १२३ नागरिकांना सर्पदंश झाल्याची नोंद झाली आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत उपजिल्हा रुग्णालयासह विविध आरोग्य केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्पदंशाचे रुग्ण दाखल झाले. वाढत्या घटनांमुळे आरोग्य विभाग आणि प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगत नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, वेळेत उपचार मिळाल्यामुळे सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर राहिली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच पावसाळ्यात बाहेर काम करणारे नागरिक सर्पदंशाच्या धोक्याला अधिक सामोरे जात असल्याचे चित्र आहे. विशेषतः शेतातील कामे, गवत कापणी, गोठ्यांची स्वच्छता आणि पाणथळ भागांतील वावर यामुळे सर्पदंशाच्या घटना वाढत आहेत.
सततच्या पावसामुळे सापांची नैसर्गिक बिळे पाण्याखाली जात असल्याने ते सुरक्षिततेसाठी मानवी वस्तीकडे वळत आहेत. परिणामी घरांच्या परिसरात, शेतांमध्ये आणि गोठ्यांमध्ये साप आढळण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. आरोग्य विभागाने रात्री टॉर्चचा वापर करणे, पायात बूट घालणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि सर्पदंश झाल्यास कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता तातडीने रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. जनजागृती आणि त्वरित वैद्यकीय उपचार हेच सर्पदंशावरील सर्वात प्रभावी संरक्षण असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.




