जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका २ दिवस पुढे ! अजित पवारांच्या निधनामुळे दुखवटा !! ७ फेब्रुवारीला मतदान, ९ तारखेला मतमोजणी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात २८ ते ३० जानेवारी दुखवटा जाहीर झाला असल्याने १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम दोन दिवस लांबला आहे. राज्य निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला असून, ५ फेब्रुवारी ऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारी ऐवजी ९ फेब्रुवारीला मतमोजणी होईल.
राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारीला निवडणूक कार्यक्रम घोषित केला होता. नामनिर्देशन, त्याची छानणी, मागे घेणे, चिन्हवाटप व उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याच्या टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उरलेले मतदान, मतमोजणी व निवडणूक निकाल राजपत्रात प्रसिद्ध करणे असे टप्पे शिल्लक होते.
सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीनंतर फक्त दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली असली तरी अजित पवार यांचे २८ जानेवारीला झालेले निधन लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला.संबंधित जिल्हाधिकारी ३१ जानेवारीला सुधारित कार्यक्रम प्रसिद्ध करतील. ७ फेब्रुवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. प्रचार ५ फेब्रुवारी रात्री १० वाजेपर्यंत चालेल. मतमोजणी ९ फेब्रुवारी सकाळी १० वाजता सुरू होईल. निकालानंतर आचारसंहिता उठेल.




