मोरवाडी जिल्हा परिषद शाळात बालवारकरी विठुमाऊलीच्या भक्तीत झाले दंग
Magesh pawar
किकवी : पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरवाडी,ता.भोर,जि.पुणे येथील विद्यार्थी, वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा वातावरणात विठूमाऊलींचा दिंडी सोहळा गावात रंगला.
महाराष्ट्रातला सर्वात मोठया प्रमाणात साजरा केला जाणारा सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो. भागवत संप्रदायाच्या परंपरेला अनुसरून दरवर्षी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजाच्या दिंड्या अनुक्रमे आळंदी व देहू येथून निघून पंढरपूरला प्रस्थान करतात, या पायी वारीला पंढरपुरला पोहचण्याकरिता साधारणपणे 18 ते 21 दिवसांचा प्रवास असतो.
आषाढी एकादशीला म्हणजेच आषाढ शुध्द एकादशीला सर्व भक्तगण पंढरपूरला विठोबा-रखुमाईचे दर्शन घेतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बारशीला एकादशीचा उपवास सोडुन सर्व वारकरी विठुमाऊलीचा निरोप घेऊन आपापल्या गावी परततात.
पंढरीची वारी म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे अध्यात्मिक सांस्कृतिक वैभव. लाखो वारकरी ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालखी बरोबर मुखी विठ्ठल नामघोष करीत उत्साहाने, आनंदाने शिस्तीत वारीत सामील होतात. हा भक्तिरसाचा वारसा विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरवाडी याठिकाणी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रोज शाळेच्या गणवेशात असलेली लहान मुले-मुली आज मात्र पांढरा कुर्ता आणि डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, डोक्यावर तुळस घेऊन वारकऱ्यांचे पोशाख परिधान केलेले दिसत होते.
” विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली ” या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाई च्या भक्तीत यावेळी ज्ञान मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला.
या दिंडी कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका वैशाली सुतार, शिक्षक बाळासाहेब गायकवाड, सुरेश जाधव व अरुण होडशिळ, शिक्षक तसेच ग्रामस्थ आणि महिला मंडळ उपस्थित होते.




