पेंजळवाडी येथे नव्या वीज उपकेंद्राची चंद्रकांत बाठे यांच्याकडून आमदार मांडेकर यांच्याकडे मागणी
भोर, ता. ८ ऑक्टोबर (प्रतिनिधी) :भोर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे त्रास सहन करावा लागत असून, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघावा म्हणून पेंजळवाडी येथे नवीन ३३/११ केव्ही महावितरण उपकेंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत बाठे यांनी आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्याकडे केली आहे.
सध्या भोरच्या पूर्व भागाला परिंचे येथील ३३/११ केव्ही सबस्टेशनवरून वीजपुरवठा केला जातो. मात्र, या उपकेंद्राचा १० एमव्हीए पीटीएफ लोड १०० टक्क्यांहून अधिक झाल्याने ग्राहकांना व्होल्टेज कमी मिळत असून, पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः ११ केव्ही पेंजळवाडी एजी फिडर सुमारे २४ कि.मी. लांबीचा असून, डोंगराळ भागातून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
तसेच, कामथडी ईएचव्ही केंद्रावरून २९ कि.मी. अंतरावर असलेल्या निगडे २२ केव्ही फिडरला देखील अशाच समस्या जाणवत आहेत. या दोन फिडरचे विभाजन करून स्थिर वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी आणि भविष्यातील वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी पेंजळवाडी येथे नवीन ३३/११ केव्ही सबस्टेशन उभारणे अत्यावश्यक असल्याचे बाठे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
या मागणीबाबत आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संबंधित विभागाशी चर्चा करून लवकरच कारवाई होईल, असे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे.
या उपकेंद्राच्या उभारणीमुळे पेंजळवाडी, कामथडी, निगडे, कोथरूड आणि परिसरातील शेतकऱ्यांना अखंड, दर्जेदार आणि स्थिर वीजपुरवठा मिळेल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.




