कृषिपंप बसवताना दुर्दैवी घटना ! माजी सरपंचासह सख्या भावाचा बुडून मृत्यू !! गुंजवणी धरण भागात शोककळा
वेल्हे : राजगड तालुक्यातील घेवंडे येथे रविवारी (१२) दुपारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शेतीसाठी कृषिपंप बसविताना निव्ही-घेवंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दामाजी भाऊराव गायकवाड (५०) आणि त्यांचे बंधू दत्तात्रेय उर्फ दत्तू भाऊराव गायकवाड (५५) यांना विजेचा जोरदार धक्का बसला. धक्क्यामुळे दोघांचा तोल जाऊन ते खोल पाण्यात बुडाले.
सदर घटनेची दखल घेत ग्रामस्थांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. वेल्हे पोलीस स्टेशनमार्फत हवेली आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाला सूचना देण्यात आली. पोलीस अधिकारी अमित देशमुख, राजेंद्र आवदे, शुभम कदम तसेच बचाव पथक सायंकाळी ६.३० वाजता दामाजी यांचा मृतदेह शोधून काढले. मात्र, दत्तात्रेय यांचा मृतदेह अंधारामुळे सापडला नाही. रात्री १० वाजेपर्यंत शोधमोहीम चालू होती. सोमवारी (१३) सकाळी पुन्हा प्रयत्न सुरू होणार आहेत.
बचावकार्यात तानाजी भोसले, गणेश सपकाळ (पोलीस पाटील), उत्तम पिसाळ, विक्रम बिरामने, संदीप सोलस्कर, संजय चोरघे, समीर जाधव यांचा सक्रिय सहभाग होता. माजी सरपंच दामाजी यांच्या अकाली निधनाने घेवंडे आणि राजगड तालुक्यात शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.




