राजगड साखर कारखान्याचा अभिनव उपक्रम ! ऊस लागवडीचा शुभारंभ थेट शेतात !! चेअरमन संग्रामदादा थोपटेच्या हस्ते खानापूर येथे उत्साहात संपन्न
भोर : राजगड सहकारी साखर कारखान्याच्या ऊस लागवड विकास कार्यक्रम २०२५–२६ अंतर्गत ऊस लागवडीचा शुभारंभ आज भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील मौजे खानापूर येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन भोर-राजगड-मुळशीचे आमदार व कारखान्याचे चेअरमन संग्रामदादा थोपटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी जितेंद्र भरत पोळ आणि शिवाजी रामभाऊ थोपटे यांच्या शेताच्या बांधावर को-८६.०३२ या जातीचे निकोप ऊस बियाणे थेट उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे ऊस लागवड कार्यक्रमाचा प्रत्यक्ष शुभारंभ झाला असून, शेतकऱ्यांमध्ये नवउत्साह संचारला आहे, शुभारंभ सोहळ्यात बोलताना संग्रामदादा थोपटे म्हणाले की, राजगड सहकारी साखर कारखान्याचा आगामी गाळप हंगाम सुरळीत पार पडावा, यासाठी कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना बियाणे शेताच्या बांधावरच पुरवले जात असून, कारखान्याच्या वतीने ऊसासाठी आवश्यक खते टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जाणार आहेत, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ऊस उत्पादनवाढ साध्य करण्यासाठी कारखाना शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करेल.
यावेळी कार्यक्रमाला राजगड सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन पोपटराव सुके, संचालक उत्तमराव थोपटे, सुभाषराव कोंढाळकर, सुधीर खोपडे, अरविंद सोंडकर, अनिल सावले, अतुल
किंद्रे, अमर बुदगुडे, संदीप नांगरे, मधुकर कानडे, राजेंद्र शेटे, पोपटराव मालुसरे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच भागातील अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही या निमित्ताने सहभाग घेतला.राजगड कारखान्याच्या या उपक्रमामुळे ऊस लागवडीचे प्रमाण वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात स्थैर्य येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.




