नसरापूर येथील २८ वर्षीय युवकाचा अचानक मृत्यू : कारण अद्याप स्पष्ट नाही
विशाल शिंदे,
नसरापूर.
नसरापूर : दि. ४ मे पुणे-सातारा महामार्गालगत असलेल्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे रविवारी दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. अक्षय देविदास रिंगे (वय २८, रा. स्वामी समर्थ नगर, नसरापूर) या तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. अतिशय उमदा, हसतमुख आणि समाजाभिमुख स्वभावाचा अक्षय अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अक्षय हा रविवारी दुपारी आपल्या राहत्या घरी झोपला होता. दुपारी १२:३० वाजण्याच्या दरम्यान झोपेतून उठत असताना त्याला चक्कर आली आणि तो अचानक खाली जमिनीवर कोसळला. ही घटना घडताच घरातील सदस्य आणि शेजारी धावून आले. त्यांनी अक्षयला तात्काळ नसरापूर येथील सिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. प्रारंभिक अहवालानुसार, तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अक्षयच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. सामाजिक कामात सक्रिय सहभाग असलेला, खेळाची आवड असलेला आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारा युवक अचानक काळाच्या गर्तेत हरपल्याने अनेकांचे डोळे पाणावले आहेत. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून कुटुंबियांच्या दु:खात सहभागी होत श्रद्धांजली अर्पण केली.
या घटनेची माहिती अक्षयचा भाऊ हर्षल देविदास रिंगे वय २६ वर्ष यांनी राजगड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे, झालेल्या घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस करत आहे.




