विटभट्टी व्यवसायिकाची तिघांकडून फसवणूक ; राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
किकवी : काळेवाडी (ता. भोर) येथील विटभट्टी व्यवसायिकाची तिघांकडून सुमारे तीन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे, याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे,
फिर्यादी उमेश गोपाळ जाधव (वय ३९ वर्ष, रा. काळेवाडी,(केंजळ) ता. भोर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी १) सुदाम मारूती जाधव २) दिपक महादेव कोळी ३) सुरेश बबन काटकर (सर्व रा. कोरते खुर्द, ता. माणगाव, जि. रायगड) यांनी १ नोव्हेंबर २०२४ ते ३० मे २०२५ या कालावधीसाठी त्यांच्या विटभट्टीवर गारेकरी म्हणून काम करण्याचा करार केला होता. त्यासाठी तिघांनाही आगाऊ रक्कम म्हणून अनुक्रमे ९१,२०० /- रुपये, १,०३,८०० /- रुपये आणि ९८,५०० /- रुपये अशी रक्कम देण्यात आली होती. या व्यवहाराबद्दल त्यांनी नोटरीकृत करारनामा ही करुन दिला होता.
दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास तिघेही कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून निघून गेले. त्यानंतर फिर्यादींनी वारंवार त्यांना फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. परिणामी त्यांनी घेतलेली रक्कम परत न करता करारनाम्याचा भंग करून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.म्हणुन याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३१६(२), ३१८(३)आणि ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक ३७९/२०२५ नोंद करण्यात आला आहे.
घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून विटभट्टी व्यावसायिकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कोल्हे करत आहेत.




