भोर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा
किकवी : भोर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी आवश्यक असलेल्या ढिसाळ वीजपुरवठ्याविरोधात संताप व्यक्त करत महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड आणि गणेश निगडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते.
सततच्या वीज पुरवठा खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत त्यांनी तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली. भोर पूर्व भागात वीजपुरवठा दिवसाला केवळ तीन तास मिळतो. यामुळे पाणी पंप चालवता येत नाहीत आणि पिकांना धोका निर्माण झाला आहे. खुटवड म्हणाले, “महावितरणने ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती आणि नवीन लाइन टाकण्याचे काम लवकर पूर्ण करावे.
गणेश निगडे यांनीही, “शेतकऱ्यांच्या मेहनतीचे नुकसान होत आहे. वीजखंड थांबवला नाही, तर आंदोलन तीव्र करू,” असा इशारा दिला.
मोर्चा कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महावितरण अधिकाऱ्यांनी पुढील चार महिन्यांत संपूर्ण काम पूर्ण करून वीजपुरवठा पूर्ववत करू, असे आश्वासन दिल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात आंदोलनाला स्थगिती देण्यात आली. शेतकऱ्यांनी मात्र दीर्घकालीन उपाययोजना व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.




